मिरज : भारताने
न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. भारताच्या विजयानंतर देशभरात उत्साह अन् जल्लोष होता. महाराष्ट्रही मागे नव्हता. पुणे, मुंबई आणि सांगलीमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर येत आपला आनंद
साजरा केला. पण सांगलीमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागले आहे.
भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना सांगलीच्या मिरजेत दोन गटांमध्ये तुफान राडा
झाला. जल्लोषावेळी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली. अखेरीस पोलिसांनी मध्यरात्री
गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पांगवले.
भारताने
न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी
मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते. याचवेळी
दुसरा गट देखील त्या ठिकाणी आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटाकडून
जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी भारताचा विजय साजरा करणाऱ्या तरुणांनी जल्लोष
सुरू होता. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून
लावण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत होता. यावेळी
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी लाठी हातात घेऊन दोन्ही गटाला पांगवले.