महापूर आणि व्यापारी.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महापूर आणि व्यापारी.....




महापूर आणि व्यापारी.....

वास्तविक सदर विषय हा सर्वच प्रसारमाध्यमे यांनी उचलून धरणं आवश्यक आहे,...

सध्याची पूरस्थिती आणि दीर्घकाळ टिकून राहिलेलं पाणी, की जे कमी होतच नाही,हा विषय मोठा गंभीर आणि चिंतनाचा आहे,कुठंतरी गफलत होतेय,जी लोकांना समजत नाही,किंबहुना खरं पुढं आणलं जात नाही,आणि लोकांच्या जीवाशी अघोरी खेळ खेळला जातोय,असं चित्र, वास्तव आहे,
सांगली शहराने 2005-19-21 तीन महापूर अनुभवले आहेत,पण पाणी पातळी, आणि दीर्घकाळ टिकणारे पाणी प्रथम अनुभवास आहे,
आलमट्टी ने 2019 सारखी भूमिका घेतली की कोयनेतून विसर्ग जास्त आहे?
जर आलमट्टी मधून विसर्ग सुरू आहे, तर मग इथली फुग का कमी होत नाही?हा सामान्य प्रश्न लोकांना पडला आहे, पण वास्तव असं आहे की आलमट्टी चा विसर्ग हा त्यांना आवक जेवढी आहे,तेवढाच होतोय,त्यामुळे आधीची जी पातळी आहे त्याची फुग ही तशीच आहे,जर काहीकाळ 4 किंवा 5 लाख विसर्ग करण्यास त्यांना भाग पाडले असते तर कदाचित इथं हे चित्र वेगळं आणि अनुकूल असतं, आम्हास असंही समजतंय किंबहुना एक व्हिडिओ व्हायरल झालाय की महाराष्ट्र राज्यातून आलमट्टी ला पाणी जास्तीचे विसर्ग करण्याची प्रॉपर विनंती किंवा मागणीच नाही,असं तिथले अधिकारी सांगत आहेत,असं असेल तर मात्र हे अक्षम्य आहे, सदर इथला कोण अधिकारी आहे त्याला पूरग्रस्त लोकांच्या ताब्यात द्या,जी शिक्षा द्यायची ती ते लोक देतील,
वास्तविक नियमानुसार पाणी साठवले जाते आणि विसर्ग होतोय का?हे पाहणं अधिकारी बरोबर इथल्या लोकप्रतिनिधी यांचे कर्तव्य आहे,पण त्या बाबतीत पाठपुरावा आणि संवेदनशील असं कोणतंही कृत्य निदर्शनास येत नाही,लोकप्रतिनिधी हे विजलेल्या दिव्यासारखे वागत आहेत,असं म्हणणं वावगं नाही,
राज्यसरकार-स्थानिक प्रशासन हे देखील या बाबतीत असंवेदनशील दिसत आहेत,
पाणी येणार-घर सोडा इतकी घोषणा करण्या पलीकडे काहीही होताना दिसत नाही,
*आता सर्वात महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित होतोय, की पुढीलवर्षी किंवा दरवर्षी असं किंवा यापेक्षा गंभीर चित्र असणार का?*
मग यावर कोणत्या ठोस उपाययोजना करणार आहात?हे इथल्या लोकप्रतिनिधी यांनी भूमिका स्पष्ट करा,सध्या पूरग्रस्त लोकांच्या-भागांच्या भेटी या येणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आहे, कदाचित पुढं निवडणूक नसती तर पूर नक्की आला असता,असं लोक म्हणत आहेत,


वास्तविक अश्या वातावरणात सर्वच पक्षाच्या लोकांनी एकत्र अश्या भेटी पूरग्रस्तांना द्याव्यात व एकत्र बसून पाणी पातळी कमी होण्यासाठी सरकार वर दबाव टाकून काम करावं असं अभिप्रेत आहे,पण इथं राजकारण आणि श्रेयवाद यातून वर आलं तर हे समजेल,
*येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार उभारणार असेल त्याने या महापूर या विषयावर ,आणि इथं अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी कोणते ठोस प्रयत्न करणार आहे?याचे लेखी स्वरूपात स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध करावा, आणि मग मतं मागावीत,*
सांगलीची बाजारपेठ ही अखंड पुरपट्यात आहे, गेली एक महिना झालं लोक जीव मुठीत घेऊन व्यवसाय करत आहेत,पाणी येणार म्हणून माल मिळेल त्या ठिकाणी हलवून बसले आहेत,पण आता माल परत आणला आणि पाणी आलं तर काय करायचं?या भीतीने तो माल पण आणत नाही,परिणामी मोठं नुकसान होतंय, बाजारपेठेला एक बकाल असं स्वरूप प्राप्त झालंय, याची चौकशी करायला एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही,याचा खेद आणि निषेध या माध्यमातून आम्ही करतो आहोत,वास्तविक कर आम्ही भरतोय,स्थानिक आणि राज्य संस्था आमच्या जीवावर चालतात,इथल्या सर्वच स्थानिक प्रशासनाचे खर्च आणि पगार आम्ही गोळा करून दिलेल्या करातून होतो,हे सोयीस्कर पणाने तुम्ही विसरताय,पण कुठंतरी सहनशीलता संपेल आणि उत्तर मिळेल, ती वेळ येऊ देऊ नका,


दरवर्षी अशी स्थिती असेल, तर आमचा निकाल लावा,*अन्यथा सर्वच सरकारी कार्यालये इथं बाजारात शिफ्ट करा,आणि त्याठिकाणी बाजारपेठ करा,म्हणजे काय असतं ते तुम्हालाही अनुभवास येईल*
लाडकी बहीण-भाऊ यांना पैसे वाटताना,लाडक्या व्यापाऱ्यांस घाटावर पोहोचवलं की काय?कर हा विकासासाठी गोळा करून तुमच्या हवाली केला आहे,असं वाटण्यासाठी नाही,असं असेल तर लाडका व्यापारी पेन्शन योजना जाहीर करण्याचे धाडस सरकार ने करून दाखवावे,
आज 15 दिवस झालं इथलं पाणी हटत नाही,मंत्रिमंडळात कुठंही याबाबतीत चर्चा झालेली दिसली नाही,आणि लोकप्रतिनिधी पाठपुरावा करताना सुद्धा दिसले नाहीत,


सांगलीच्या चार गल्यांच्या बाजारपेठेत गेल्या कित्येक वर्षात किती मोठी दुकानं निघाली?हे आयुक्त,जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार ,खासदार यांनी सांगावं आणि आत्मचिंतन करावं,किती नवीन व्यवसाय,दुकानं निघवीत म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात?हे जरा पुराव्यासहित सांगा,उलट एखादा नवीन काही चालू करत असेल तर त्याला नानाप्रकारे त्रास देण्यात अधिकारी पटाईत आहेत,
आपण आमचे नेतृत्व करताय,पालक म्हणून मिरवताय म्हणून जाणीव करून देत आहोत,
आपणांस या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की सदर पुरस्थितीतून लोकांना बाहेर काढावे,जर कोयनेतून विसर्ग वाढला तर इथं भयाण स्थिती होईल, त्याची जवाबदारी आपली असेल,
जास्त लिहिणं उचित नाही,
धन्यवाद,
सांगली,
दि:-02/08/2024
*व्यापारी एकता असोसिएशन,सांगली*
____________________________________________


हे झालं व्यापारी एकता असोसिएशनचे मत....

आता सेंचुरी मार्केट कमिटी जी शंभर फुटीला व्यापारी संघटना आहे.. व नेहमी महापूर नसताना सुद्धा पावसाळ्यात कायम पाण्यात असणारे "सांगली लोखंड मार्केट" म्हणजे आकाशवाणी जवळील कोल्हापूर रोडचे "स्क्रॅप मार्केट" याचा अध्यक्ष म्हणून  आपणांसमोर आज सविस्तर माझ्या भावना व्यक्त करीत आहे...



तसं पाहायला गेल्यानंतर सहा गल्ल्याची सांगली...
कालांतराने या सांगलीची प्रगती होत गेली व आता सांगली मिरज कुपवाड अंकली, माधवनगर, बुधगाव, इत्यादी  असे सर्व एकत्रित येत एक मोठे शहर म्हणून उदयास आलय...

मात्र सांगलीस एक मोठा शाप आहे..

आम्ही पन्नास वर्षे झालं बघतोय, सांगली साठी कोणत्याही प्रकारचे प्रगतीचं अथवा सांगलीकरांच्या कल्याणाचं कोणतही कार्य आज पावतो प्रशासनाने अथवा येथील सर्व पक्षांच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिधिनी केलेल नाही..

प्रत्येक निवडणुकीत आम्ही कसे चांगले आहोत... याबाबतीत लोकांना गुंडाळून निवडून येण्याची किमया फक्त सांगलीच्याच लोकप्रतिनिधी मध्ये आहे..

जवळची लहान लहान शहरे बघितली.. जसे अकलूज, लातूर, बारामती, कोल्हापूर, या शहराच्या तुलनेमध्ये सांगलीची प्रगती शून्य आहे...

कधी काळी सांगलीचे मार्केट यार्ड ही फार मोठी बाजारपेठ होती .... सांगलीच्या गणपती पेठे मधून  जिल्ह्याच्या ठिकाणी आजूबाजूस असणाऱ्या  कर्नाटकामध्ये  येथून माल  पुरवठा होत होता...

सांगली मधून हळद, बेदाणा, द्राक्षे व  साखर  ई.याची मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेत आमची सांगलीच्या या उच्च दर्जाच्या वस्तूंना मागणी होती आणि आहे..

परंतु, सांगलीला एक शाप लागलेला आहे.. 

आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतो तसं सांगलीला ग्रामपंचायत करण्याची लायकीची सांगली आहे पण कोणीही लोकंप्रतिनिधी या मागणीकडे आवर्जून लक्ष देत नाही..

आम्ही पहात आहोत अनेक वर्षापासून आपल्या ताटात कसे पद आमदारकी, खासदारकी, पडेल याच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधींनी सांगलीसाठी कोणती  आस्था ठेवलेली नाही..
त्यामुळे सांगलीची वाट लागलेली आहे

 आणि हे सांगलीकर म्हणून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत..

आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुराचा...

या पुराचं राजकारण करण्यात आम्हाला हशील नाही... पण गेली   दहा ते पंधरा वर्षे झालं प्रत्येक वर्षी  पुराची धास्ती घेऊन सांगलीकर जगत आहेत कृष्णाकाठी राहणाऱ्या रहिवाशांना व  व्यापाऱ्यांना सांगलीत  राहणे ही एक शिक्षाच होऊन बसल्याचे दिसून येत आहे.. त्याचं मूळ कारण म्हणजे प्रशासन व लोकप्रतिनिधींचा सांगली साठी असणाऱ्या अस्थेचा अभाव..

नैसर्गिकरीच्या रित्या पाऊस जादा झाल्यानंतर पूर येणे अपेक्षित आहेच..
 पूर येणार म्हणून त्याच्याविषयी कोणत्याही योजना सांगलीसाठी आज तरी अवतरलेल्या नाहीत

याचं प्रमुख कारण असं आहे ,केंद्र सरकार असो,राज्य सरकार असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे त्यांनी फक्त आपल्या पदासाठीच ह्या सांगलीमध्ये काम केलेल आहे ..आणि सांगली विषई कोणताही चांगला निर्णय त्यांनी घेतलेला नसल्यामुळे ही सांगलीची गत झालेली आहे

महापुराचे म्हटलं तर, अलमट्टीची उंची वाढवताना सांगलीतून थोडका विरोध झाला, त्यानंतर सांगली मधून जे जे पूल बांधले गेले.. त्यामधून पाण्याची फुग वाढत आहे ..सांगली कृष्णा नदीमध्ये कराड ते मिरज पर्यंत या नदीची खोली दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणी उथळ माथ्याने वाहत आहे...  .. सांगली साठी असणारे नैसर्गिक नाले आता लुप्त झालेले आहेत. त्यामुळे हे पाणी शहर गावांमध्ये पसरत आहे..

त्यासाठी नदीची खोली करण्यासाठी कोणीही आघाडी घेत नाही ..

अंकली ते मिरज नॅशनल हायवे रस्ता झाला त्यावेळी देखील सांगलीतून वाहून जाणारे पाण्याचा सोर्स या रस्त्यामुळे पूर्ण बंद झालेला आहे  ... जर पूर आला तर गेल्यावेळी जिथे सात फूट पाणी होते तिथे किमान 14 फूट पाणी आज तरी उभारणार आहे ...आणि ती फुग खरे कॉलनी, समता नगर, असं करत  मिरजेच्या रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार असल्याचं तज्ञांचे मत आहे ...


आता मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे ती सेंचुरी मार्केट कमिटी 100 फुटी ला 1100 दुकान गाळे असलेली संस्था 1992 पासून कार्यरत आहे ..पण शंभर फुटीला आता धास्तीमध्ये राहण्याची  सवय झाली आहे ..

कोल्हापूर रस्त्याला सांगली लोखंड मार्केट अर्थात स्क्रॅप मार्केट जिथे 170 दुकान गाळे आहेत त्यामध्ये महापूर नसताना देखील प्रत्येक वर्षी पावसामध्ये चार ते पाच फूट पाणी उभे राहते.. आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींना ही बाब कानावर घालून सुद्धा या  बाबतीत हा विषय दुर्लक्षित झालेला आहे.. तळागाळातल्या व गोरगरीब गाळेधारकांना कोणतीही सुविधा आज पावतो प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी दिलेली नाही... तीच परिस्थिती शामरावनगर मध्ये आहे..

तर या अशा या सांगलीच्या अकार्यक्षम सुविधामुळे सांगलीची "ग्रामपंचायत" करावी याबाबत काही संघटनाच्या वतीने  आघाडी घेऊन न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल करावी का?? असा विचार आता आमच्या मनाला शिवत आहे..

महापालिकेचे बाबतीत तर काय बोलावं.....

भरमसाठ कर लावून कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता पैसे उकळण्याचा उद्योग फक्त महापालिका करते आहे ..परंतु या अधिकाऱ्यांनी कधी आत्मचिंतन केले आहे का ,आम्ही या नागरिकांच्या कडून कर घेत आहोत.. पण  नागरिकांना कोणत्या कोणत्या सुविधा देत आहोत?? 

याचं कुणीही आत्मचिंतन केलेलं नसल्यामुळे सांगलीची ही दैना झाली आहे 

असो ,
सांगली विषयी लिहायचं झालं तर शंभर पानाची कादंबरी होऊन जाईल.. आता तूर्तास एवढच...

 आपला: सलीम नदाफ; अध्यक्ष ;सेंचुरी मार्केट कमिटी, सांगली व अध्यक्ष :सांगली लोखंड मार्केट अर्थातच "स्क्रॅप मार्केट" कोल्हापूर रोड सांगली 
8830247886